अगदी लेखकाच्या मनोगतापासुन सुरू झालेली ही लेखांची वेल शेवटच्या पानावरील प्रोत्साहनपर लेखापर्यंत ईतकी छान बहरत गेलीय कि मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मुळातच गावसंस्कृतीशी नाळ जोडली गेली असल्यामुळे लेखकाने आपले स्वानुभव ईतके उत्कृष्ट शब्दात मांडलेत कि प्रत्येक वाचकाला आपण स्वतः हे प्रसंग जगलोयत अशा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
निसर्गावर भरभरून प्रेम करायला लावणारा हा ललितसंग्रह प्रत्येक व्यक्तिच्या मनाचे कप्पे अलगद उघडणारा वाटतो, लेखकाने स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर मनाच्या तळघरात डोकावा असे सांगितलय आणि त्यासाठी एकांत हवा कारण एकांत हा मनाचा दरवाजा उघडणारा द्वारपाल आहे...हे आणि अशी अनेक दर्जेदार वाक्य विशेष लक्ष वेधून घेतात.
सुरूवातीचे लेख "बालपणीचा काळ सुखाचा" आणि "टर्निंग पॉईंट" अगदी मनाला भावुन जातात, निसर्गाला "बिनभिंतीची शाळा" ही दिलेली उपमा अप्रतिम आहे. आपल्या अवतीभवती चाललेल्या सर्व घटनांचा अगदी बारीक अभ्यास करून त्यांना आपल्या शब्दात कैद करण्याची लेखकाची एक वेगळीच लकब या पुस्तकात अनुभवायला मिळाली, त्याचबरोबर राजन कुलकर्णी सरांनी दिलेली प्रस्तावना नवलेखकांसाठी प्रोत्साहीत करणारी आहे.
विनय पब्लिकेशन द्वारे प्रकाशित झालेली ही अमरवेल अशीच बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, या अमरवेलीवर लेखांची असंख्य फुले उमलावित आणि त्यांची आमच्या सारख्या वाचनवेड्या वाचकांवर अखंड उधळण होत रहावी हीच सदिच्छा.????
लेखक अमर मुसळेंना त्यांच्या भावी साहित्य वाटचालीस असंख्य शुभेच्छा. ????
सचिन आकुडकर २२/११/२०२०